जामखेड बाजार समितीत हरबरा व तुर हमीभाव केंद्र सुरू;
शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घेण्याचे बाजार समितीचे आवाहन
हरबरा ५८७५ रुपये तर तुर ८००० रुपये प्रती क्विंटल हमीभाव
जामखेड प्रतिनिधी,
महाराष्ट्र शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भर कृषी अभियान अंतर्गत हमी भाव योजनेंतर्गत २०२५/२६ या हंगामासाठी
NCCF व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड च्या मुख्य बाजार आवार जामखेड येथे हरबरा व तुर या पिकांसाठी शासकीय हमीभाव नोंदणी व खरेदी केंद्र सुरू केले असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती पै शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे व संचालकांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. प्रा राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध उपाय योजना केल्या जातात त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भर कृषी अभियान अंतर्गत हमीभाव योजनेंतर्गत २०२५-२६ या हंगामासाठी NCCF व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड यांनी हरबरा व तुर या पिकांसाठी हमीभाव केंद्र सुरू केले आहे. या हमीभाव केंद्रात हरबरा ५८७५ रुपये प्रती क्विंटल तर तुर ८००० रुपये प्रती क्विंटल या भावाने खरेदी केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा नक्कीच जास्त रक्कम मिळून त्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. तरी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती पै शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे व संचालकांनी केले आहे.
बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे हमीभाव केंद्र बाजार समितीतच असून हरबरा व तुर उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या हरबरा व तुर पिकांची रितसर नोंदणी करावी. यासाठी येताना सन २०२५-२६ ऑनलाईन पिक पेरा असलेला ७/१२ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स व IFSC कोड सहित आधारलिंक असलेले बँक पासबुक ही कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.

नियमानुसार नोंदणी व खरेदी वेळ ही सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत असून शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार एफ.ए.क्यु. दर्जाचा माल खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
![]()
