प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आपत्तीच्या काळात कुठलीही जीवित वा पशुहानी होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक-सभापती राम शिंदे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतपीक, घरे, विहिरी, पशुधन आणि ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन बाधित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्ष पुरग्रस्त भागांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीचे निरीक्षण केले.
या पाहणीदरम्यान, महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सभापती राम शिंदे ,जिल्हाधिकारी डॉ.पंकजजी आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथजी घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंदजी भंडारी, कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता अल्का अहिरराव, कार्यकारी अभियंता श्री.प्रवीण घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी श्री.नितीन पाटील, तहसीलदार श्री.मच्छिंद्र ठाणके यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागातील अधिकारी, जामखेड तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरडवाडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या पुलाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. मोहरी येथे तुटलेल्या तलावाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले. दिघोळ व जातेगाव येथे मांजरा नदीच्या पुराने शेतजमिनी वाहून गेल्या आहेत तसेच अनेक नागरिकांच्या घरांचे आणि वस्तूंचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी जाऊन सभापती राम शिंदे यांनी परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, सर्व शेतपीक, जमीन, घरे, पशुधन आणि अन्य नुकसानीचे तातडीने व सरसकट पंचनामे करून नागरिकांना मदत त्वरित पोहोचवावी. एकही नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही याची हमी देण्यात आली आहे.
या नैसर्गिक संकटाच्या काळात घाबरून न जाता धैर्याने सामना करणे गरजेचे आहे. एकमेकांना सहकार्य करणे हीच खरी ताकद आहे. प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आपत्तीच्या काळात कुठलीही जीवित वा पशुहानी होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सर्वांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या पाठबळाने आपण हे संकट नक्कीच पार करू.असा दिलासा शेतकऱ्यांना व नागरिकांना यावेळी सभापती राम शिंदे यांनी दिला.