*कन्या विद्यालयातील गुरुकुल पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद*
विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर
जामखेड : रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय, जामखेड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील गुरुकुल पालक मेळावा शुक्रवारी (दि. १०) उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शाळा यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य प्रा. कुंडल (प्रदीप) राळेभात होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल कमिटी सदस्य प्रकाश सदाफुले, मुख्याध्यापिका रोहिणी भोर, प्रभारी पर्यवेक्षक मोहन यादव, प्रा. शिवाजी राळेभात आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पालकांसह शिक्षिका मनिषा कोल्हे, सीमा शेळके आणि मिरा साळुंखे आदी शिक्षक व पुरुष पालक व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका रोहिणी भोर यांनी विद्यार्थिनींचे संस्कार, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि पालकांच्या सहकार्याचे महत्त्व विशद केले. पालक मेळावा हा शाळा आणि पालक यांच्यातील संवादाचा प्रभावी सेतू असून, विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गुणवत्तेची, प्रगतीची तसेच सर्वांगीण विकासाची सविस्तर चर्चा करण्याची महत्त्वपूर्ण संधी या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर शिक्षक विलास पवार यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी, सचिन डोईफोडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विषयाची ओळख व भविष्यातील संधी, तर गुरुकुल प्रमुख विक्रम भोगे यांनी गुरुकुल प्रकल्प तसेच विविध सहशालेय उपक्रमांची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्रा.कुंडल उर्फ प्रदीप राळेभात यांनी पालकांच्या शाळेकडून असलेल्या अपेक्षा आणि शाळेच्या पालकांकडून असलेल्या अपेक्षा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी शाळेशी सातत्याने संवाद ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभूदेव बडे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रभारी पर्यवेक्षक मोहन यादव यांनी मानले.
![]()
