जामखेड तालुक्यातील भुतवडा येथे बिबट्याचा जनावरावर हल्ला

जामखेड प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून जामखेड परिसरात बिबट्याला अनेक लोकांनी पाहिले आहे. दि १० रोजी रात्री राजेंद्र कोठारी यांच्या शेतात भुतवडा तलावाजवळ रात्री 3 बिबटे आले होते. कोठारी यांच्या गाय गोठ्यातील एका गायीला बिबट्यांनी मारले आहे.मृत गायीची अवस्था पाहून अनेकांच्या मनात भीतीचा गोळा येत आहे. या ठिकाणी आणखी ३० गाया गोठ्यात आहेत.

रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे फार भीती निर्माण झाली आहे. शेजारी असलेल्या चार वस्तीतील लोक सकाळी ८ वाजेपर्यंत घराबाहेर आले नव्हते. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी सांगितले.

या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वनविभागाचे आधिकारी तसेच तहसीलदार यांना तातडीने फोन करून माहिती दिली. घटना गंभीर असून तातडीने सुरक्षेचे पावलं उचलण्याची विनंती केली तसेच ताबडतोब माणसं पाठवावेत सदर घटनेचा पंचनामा करून घ्यावा अशीही विनंती केली.

गेल्या काही दिवसांपासून जामखेड तालुक्यासह शहराजवळील काही भागात बिबट्या अनेक लोकांनी पाहिला आहे. त्याबाबत संबंधित प्रशासनालाही माहिती आहे. संबंधित वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी बिबट्याच्या मागावर आहेत. जामखेड तालुक्यात साकत, भूतवडा, सावरगाव, लेहनेवाडी, धोत्री, आदी भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याला अनेक ठिकाणी लोकांनी पाहिले आहे.

वनविभागाच्या जिल्हा पातळीवरील आधिकारयांनी लक्ष घालून बिबट्या पकडण्याचे पिंजरे व प्रशिक्षित कर्मचारी स्टाफ जामखेडला पाठविण्याची गरज आहे. तातडीने वनविभागाने याची दखल घ्यावी. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी व येण्या जाण्यासही भीती वाटत आहे.जामखेड परिसरातील नागरिक फार मोठ्या भीतीच्या वातावरणात वावरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *