शेतकऱ्यांच्या मोटार-केबल चोरीप्रकरणी चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंडारी स्टीलवर कठोर कारवाईची मागणी – मंगेश दादा आजबे
जामखेड तालुक्यात मोटार व केबल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी संतप्त;तहसीलदारांना व पोलीस स्टेशनला दिले निवेदन
जामखेड प्रतिनिधी-
जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी, केबल तसेच इतर कृषी साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते मंगेश दादा आजबे बोलताना म्हणाले की,जामखेड तालुक्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या वीज मोटारी, केबल आणि बॅटऱ्या चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असूनही अद्याप बहुतांश चोरीचा माल परत मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.पोलीसांनी काही प्रमाणात चोरीचा संशय असलेला तांब्याचा तार व स्टील केबलचा माल जप्त केल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणाची सखोल तपास करून चोरीला गेलेल्या वस्तूंची ओळख पटवून त्या संबंधित शेतकऱ्यांना परत मिळाल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ नये.
शेतकरी रक्ताचे पाणी करून शेती करतो. त्याच्या उपजीविकेची साधने चोरीला जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे. तालुक्यातील सर्व स्टिल भांडे दुकान व भंगार दुकानांची नियमित तपासणी करून चोरीचा माल खरेदी-विक्री होत नाही ना, याची पोलीसांनी आठवड्याला पडताळणी करावी.ज्या शेतकऱ्यांच्या मोटारी, केबल किंवा इतर साहित्य चोरीला गेले आहे, त्यांनी पुढे येऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. चोरीच्या घटनांमध्ये दोषी असलेल्या भंडारी स्टील या दुकानदारांवर तसेच चोरीचा माल खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 
जामखेड तालुक्यात चोरीचा माल खरेदी करण्याची साखळी पूर्णपणे बंद झाली पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका मंगेश दादा आजबे यांनी सांगितले आहे.या चोरीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून शेतीच्या कामांवरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे.
अलीकडेच जामखेड येथील अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील शेतकरी तहसीलदारांना निवेदन दिले आहे त्यामध्ये मोटार, केबल व कृषी साहित्य चोरीच्या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तालुक्यातील भंगार व स्टील खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांची नियमित तपासणी करावी, ग्रामीण भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.
चौकट –
पोलीस प्रशासनाने जप्त करण्यात आलेल्या चोरीच्या मालाची सखोल चौकशी करून, तो माल कोणकोणत्या चोरांकडून खरेदी करण्यात आला याची माहिती जनतेसमोर जाहीर करावी. तसेच चोरीचा माल खरेदी करणाऱ्या संबंधित आरोपींची माहिती प्रसिद्ध करून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसेल व शेतकऱ्यांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल.
![]()



