शिवरायांचे विचार प्रत्येक घरात पोहचण्यासाठी व रूजवण्यासाठी शिवराज्य यात्रा – राणीताई लंके
जामखेड प्रतिनिधी –
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होऊन 350 वर्षे झाली. त्यांचे अर्थशास्त्रीय विचार, पारदर्शी प्रशासन, शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ, दुरदृष्टीपणा व तरूणाईला सदैव प्रेरणा देणारे विचार हे प्रत्येक घराघरात पोहचण्यासाठी व मनात रूजवण्यासाठी शिवराज्य यात्रा काढली आहे. या यात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शिवराज्य यात्रेचे संयोजक राणीताई लंके यांनी रवीवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवराज्य यात्रा जामखेड शहरात रवीवारी आली असता तिचे ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले. यात्रेचे संयोजक राणीताई लंके यांनी शहरात ठिकठिकाणी भेट देऊन शिवराज्य यात्रेचे महत्त्व नागरीकांना सांगीतले. तसेच शहरातील मॅराथॉन स्पर्धेला भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या म्हणाल्या
शिवराज्य यात्रेची सुरवात पाथर्डी शेवगाव मधून करण्यात आली. या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पंधरा दिवस चाललेल्या यात्रेचे अहमदनगर येथे समारोप होणार असून आ. निलेश लंके व इतर मान्यवर विचार मांडणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना जनतेला केंद्रस्थानी मानले होते, जनतेच्या पैशांचा विचार करणारा आणि कष्टांची जाणीव असणारा हा महान राजा होता. पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, उद्योगधंद्याला प्रोत्साहन देणे यावर महाराजांचा भर होता. त्यामुळे केवळ ३६,००० रुपयातून सुरू केलेले स्वराज्य महाराजांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी तीन लाख ४२ हजार कोटी रुपयांचा वार्षिक उत्पन्न देणारे आर्थिकरित्या अत्यंत सक्षम असं राष्ट्र म्हणून उदयाला आलं
व्यापार व उद्योग वाढवण्यासाठी राजांनी त्या काळात पोर्तुगीज आणि इंग्रजा सारख्या मातब्बर व्यापाऱ्यांकडून देखील जकात आकारली, महाराजांच्या या धोरणामुळे कोकणातील उत्पादनांना फ्रेंच, इंग्रज, डच या व्यापा-यांना चांगला भाव देणे भाग पडले. राजांचे पारदर्शी प्रशासन, शेतकऱ्यांचा जाणता राजा, तरुणाईला सदैव प्रेरणा देणारे शिवाजी राजे, बारा बलुतेदार एकत्र करून अठरापगड जातींना संरक्षण देऊन कर्तबगारी नुसार सन्मान दिला छत्रपतींचे हे विचार प्रत्येक घराघरात पोहचण्या साठी व मनात रूजवण्यासाठी शिवराज्य यात्रा असल्याचे राणीताई लंके यांनी सांगितले.