*आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या युवा संघर्ष यात्रेवर नागपुर येथे झालेल्या पोलिसांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेड आणि खर्डा कडकडीत बंद*

जामखेड | पुणे ते नागपूर असा तब्बल 800 किलोमीटरहून अधिकचा प्रवास पूर्ण करून मंगळवारी युवा संघर्ष पदयात्रा ही नागपूर शहरात दाखल झाली. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत यावेळी नागपूर येथे सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षातील महत्त्वाचे नेते, आमदार उपस्थित होते.

यावेळी युवा संघर्ष यात्रेदरम्यान सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, शेतकरी, युवा तसेच विविध संघटना यांनी आपल्या मागण्यांचे दिलेले निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारने आपला प्रतिनिधी पाठवून ते निवेदन स्वीकारावे असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाला सकाळीच कळवूनही संध्याकाळपर्यंत कोणीही प्रतिनिधी न आल्याने सभा स्थळावरून आमदार रोहित पवार यांनी आपला मोर्चा निवेदन देण्यासाठी थेट विधान भवनाकडे वळवला.

दरम्यान, शांततेत विधान भवनाकडे जात असलेल्या युवा संघर्ष यात्री आणि आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून थांबवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांना वारंवार विनंती करूनही त्यांनी बळाचा वापर करत शेकडो संघर्ष यात्री आणि या यात्रेवर लाठी हल्ला केला यात अनेक जण जखमी देखील झाले.

यावेळी आमदार रोहित पवार, रोहित पाटील, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक कार्यकर्ते , युवा त्याठिकाणी उपस्थित होते परंतु पोलिसांनी केलेल्या हल्ल्यामुळे अनेक जण जखमी झाले त्याच घटनेच्या निषेधार्ह आज जामखेड शहर आणि खर्डा येथे नागरीकांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

सरकारचा निषेध व्यक्त करत नागरिकांनी आमदार रोहित पवार यांना पाठिंबा दिला आणि आज या भ्याड लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळला. अशा घटना घडल्याने सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा हा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे

तसेच विविध समस्या सोडवण्यासाठी आणि समाजातील सर्वच घटकातील नागरिकांना न्याय देण्यासाठी सुरू केलेल्या या यात्रेला संपुर्ण राज्यातून उदंड असं प्रतिसाद मिळाला आणि या माध्यमातून आमदार रोहित पवार सर्वसामान्यांचा आवाज विधिमंडळ सभागृहात उठवणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *